Table of Contents
प्राचीन भारतातील पहिला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य | Chandragupta Maurya Story In Marathi
चंद्रगुप्त मौर्य हा प्राचीन भारतातील पहिला चक्रवर्ती सम्राट होता की ज्याचे अस्तित्व ऐतिहासिक पुराव्यानिशी प्रमाणित होते. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना करुन प्रथमच अखंड भारताचा बराच मोठा भूभाग एकछत्री अमलाखाली आणला. अर्थात याचे श्रेय चंद्रगुप्ताचे गुरु आर्य चाणक्य यांना पण द्यावे लागेल. कारण चाणक्य यांच्याच मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्ताने वाटचाल केली. आर्य चाणक्यने नंद वंशाचा समूळ नाश करण्याची आपली प्रतिज्ञा तसेच अखंड भारताचे स्वप्न चंद्रगुप्तद्वारे पूर्ण केले.
चंद्रगुप्ताचा जन्म :
चंद्रगुप्ताच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आपल्याला निश्चित अशी फारशी माहिती मिळत नाहीं. चंद्रगुप्ताच्या वंशाबद्दल पौराणिक, बौध्द , जैन आणि ग्रीक ग्रंथामधून जी माहिती मिळते ती भिन्न स्वरुपाची आहे. काही ग्रंथकारांनी असे मत व्यक्त केले की शेवटचा नंद राजा धनानंद याची दासी मुरा हिचा चंद्रगुप्त हा मुलगा होय. ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्त हा हलक्या कुळात जन्माला आला असे म्हणतात.
मुद्राराक्षस या काव्य ग्रंथातून आपल्याला चंद्रगुप्ता विषयी काही माहिती मिळते. विषाखादत्त या मुद्राराक्षसच्या रचीयता ने चंद्रगुप्ताच्याबाबत उल्लेख केला आहे. त्यामध्ये तो असे म्हणतो की चंद्रगुप्त मौर्य हा नंदांचा नातलग आहे. प्राचीन बौध्द धर्म ग्रंथात मौर्य नावाच्या क्षत्रिय जमातीचा उल्लेख केला आहे. बौध्द ग्रंथकारांच्या मते चंद्रगुप्त हा उत्तर प्रदेशातील पिप्पलवन येथील मोरिय नावाच्या क्षत्रिय कुळात जन्माला आला असे मानतात. तथापि ठोस ऐतिहासिक पुराव्याशिवाय निष्कर्ष काढता येत नाही. चंद्रगुप्ताचा जन्म कोणत्याही कुळात झालेला का असेना पण तो महाप्रतापी चक्रवर्ती राजा होता यात काही तीळमात्र शंका नाही.
मगधवर विजय

मगध सम्राट शेवटचा नंद राजा धनानंद हा लोभी, विलासी होता. राज्यकारभार अमात्य राक्षस या एकनिष्ठ व्यक्तीकडे सोपवून राजा विलासात दंग असे. प्रजेच्या मनातसुध्दा असंतोष वाढतच होता. अशावेळी जग जिंकायला निघालेला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव धनानंदला करुन देण्यासाठी चाणक्य नंदाच्या दरबारात गेले. तेथे धनानंदने त्यांचा अपमान केला.
विलासात मग्न धनानंदाने आचार्य चाणक्यांची निंदा करुन त्यांना दरबारातुन बाहेर काढले. या अपमानाने चाणक्य क्रोधित झाले. त्यांनी भार दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत नंद कुळाचा समूळ नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही. त्यानंतर चाणक्य तक्षशिलेकडे निघून गेले. आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त यांची भेट नक्की केंव्हा व कशी झाली याबद्दल निश्चित माहिती नाही. पण त्यांची भेट झाली. चाणक्य यांनी चंद्रगुप्तातील प्रतिभा ओळखली. त्यांनी चंद्रगुप्तास आपला शिष्य बनविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त तयार होत होता. अलेक्झांडर माघारी निघून गेल्यावर त्याने आपले गीक क्षत्रप जिंकुन घेतलेल्या प्रांतावर नेमले. प्रथम चंद्रगुप्ताने या ग्रीकांना भारताबाहेर पिटाळून लावले. सिंध,पंजाब हा प्रदेश त्याने आपल्या स्वमित्वाखाली आणला.
त्यानंतर चंद्रगुप्ताने काश्मीरचा राजा प्रवर्तक याच्याशी आचार्य चाणक्यांच्या सल्ल्याने संधान बांधले. मुद्राराक्षस व जैन ग्रंथ परिशिष्टपावन यात पोरस व चंद्रगुप्त मौर्य यांच्या मैत्रीचा उल्लेख केलेला आहे. आता चंद्रगुप्ताच्या सैन्यात पंजाब, गांधार,कम्बोज या भागातील सैनिक तर होतेच शिवाय इराणी व शक सैनिकही होते. मालव, शूद्रक या पंजाबच्या आजूबाजूच्या परिसरातील राज्यांचा पाठिंबा त्याला होता. सम्राट धनानंदच्या साम्राजावर पच्श्चिम दिशेकडून योग्य नियोजनानिशी शिस्तबध्द हल्ले करायला सुरुवात केली. जवळपास दोन वर्षांनी पाटलीपुत्र या मगधच्या राजधानीवर त्याने हल्ला केला. अशाप्रकारे धनानंदचा पराभव होउन मगधच्या विशाल साम्राज्याचा अंत झाला अणि मौर्य साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली. ही घटना इ.स. पू. 322 ची आहे. अशाप्रकारे चंद्रगुप्त मगधचा सम्राट बनला.
चंद्रगुप्ताचा साम्राज्यविस्तार
चंद्रगुप्ताने केलेल्या साम्राज्यविस्ताराची माहिती प्लूटार्क अणि जस्टिन या प्राचीन इतिहासकारांच्या लेखनातून मिळते. चंद्रगुप्ताला ग्रीक व लॅटिन लेखांमध्ये अनुक्रमे सैंड्रोकोटस् आणि ऐंडोकॉटस् म्हणून ओळखले जात होते. प्लूटार्कने दिलेल्या माहितीनुसार चंद्रगुप्ताच्या ताब्यात जवळपास संपूर्ण भारत होता. त्याचे सैन्य सहा लाख होते. शिवाय त्याच्या फौजेत आठ हजार रथ, नऊ हजार हत्ती आणि तीस हजार घोडेस्वार होते. चंद्रगुप्ताने वायव्य भारत,उत्तर भारत, दक्षिण व पश्चिम भारतातील काही प्रदेश आपल्या साम्राज्यात करून घेतले.
सेल्यूकस निकेटरने इ.स.पू. 305 मध्ये भारतीय सीमेवरच्या प्रांतावर आक्रमण केले तेंव्हा त्यास चंद्रगुप्तने अटकाव घातला. सेल्यूकसला तह करायला भाग पाडले. या तहानुसार सेल्यूकसने कंदहार,काबुल, हिरात, बलुचितस्थान हे प्रांत आणि काही खंडणी दिली. शिवाय आपल्या मुलीचे हेलनचे लग्न चंद्रगुप्तासोबत लावून दिले. मॅगेस्थिनिस या ग्रीकांच्या राजदुतास चंद्र्गुप्ताच्या दरबारी ठेवल्या गेले. याच मॅगेस्थिनिसच्या ‘इंडिका’ या ग्रंथातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. ज्या ग्रीकांचा दबदबा होता त्यांनाच चंद्रगुप्ताने पराभूत केल्याने व्हिसेंट स्मिथ म्हणतात त्याप्रमाणे चंद्रगुप्ताला ‘सार्वभौम सम्राट’ ही जी मान्यता दिल्या गेली ती समर्पक ठरते.
अशा प्रकारे चंद्र्गुप्ताचे साम्राज्य वायव्यकड़े हिंद्कुशपर्यंत तर पश्चिमेकडे सौराष्ट्र हा प्रदेश त्याच्या ताब्यात होता. सौराष्ट्र प्रांत चंद्रगुप्ताच्या ताब्यात होता याची माहिती पहिल्या रूद्रदामनच्या गिरनार येथील शिलालेखांवरून मिळते. दक्षिण दिशेला कृष्णा नदी त्याच्या साम्राज्याची सीमा होती. सेल्यूकस निकेटरसोबत युध्द ही चंद्रगुप्ताच्या राजकीय जीवनातील शेवटची घटना असावी. कारण यानंतर त्याने कुठेही साम्राज्य विस्तार वा लढाया केल्या असे दिसत नाही. किंबहुना तसा कोणताही पुरावा भेटलेला नाही.
मौर्यकालीन कायदा व सुव्यवस्था | Chandragupta Maurya Story In Marathi
चंद्रगुप्ताच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम दर्जाची होती. सर्व सत्ता ही राजाच्या होती केंद्रित होती. राज्याचे प्रशासन हे आचार्य चाणक्य यांच्या ‘अर्थशास्त्र’ या सर्वसमावेशक ग्रंथानुसार चालत होते. नंद राजवटीत अनागोंदी कारभारामुळे जी अराजकता माजली होती ती आचार्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणात आणली.
भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी काही कालावधीतच आवाक्यात आणली. उत्तम दर्जाचे सक्षम गुप्तहेर खाते तयार केले व त्यामार्फत महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन केले. चंद्रगुप्ताच्या राजवटीत न्यायव्यवस्था उत्तम दर्जाची होती. मॅगेस्थिनिस च्या ‘ इंडिका ‘ मध्ये मौर्य साम्राज्यातील कायदा व सुव्यवस्था याबद्दल वर्णन केले आहे. मॅगेस्थिनिस म्हणतो , “अमावस्येच्या रात्री देखील आर्य स्त्रिया तलम व रेशमी वस्त्रे नेसून मौर्यांच्या शहरातून निवांत फिरताना आढळतात ” मॅगेस्थिनिसच्या या विधाना वरून मौर्य राजवटीतील कायदा व सुव्यवस्था कशी होती याबद्दल आपणास कल्पना येते.
चंद्रगुप्ताने हेरखात्यासोबतच स्वतःच्या सुरक्षेसाठी सुरक्षाखाते सक्षम बनविले होते. स्वरक्षणासाठी त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून विकत आणले होते. त्याच्या शयनग्रूहातही या अंगरक्षक स्त्रियांचा कडक पहारा राहत असे. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे चंद्रगुप्ताच्या सुरक्षेसाठी आचार्य चाणक्य नेहमी सतर्क राहत असत. कारण त्याच्यावर विषप्रयोग झाला होता. जेवणासोबतच विहिरी आणि जलसंचय यामध्ये विष टाकू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात असे. दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही. परंतु जो काही भाग उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताचे सामर्थ्य आणि आचार्य चाणक्य यांच्या कूटनीतीची कल्पना आपणास येते.
जैन धर्माचा स्वीकार आणि मृत्यू:
जैन धर्माच्या काही ग्रंथावरून असे माहित पडते की चंद्रगुप्ताने जैन धर्माची दीक्षा घेतली होती. जेंव्हा उत्तर भारतात दुष्काळ पडला होता तेंव्हा भद्रबाहू हे जैनमुनी आपल्या 12000 अनुयायांसह दक्षिण भारतात आले आणि कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी वसाहत करुन राहिले. चंद्रगुप्त हा भद्रबाहु यांचाच अनुयायी असल्याने तो ही भद्रबाहु यांच्यासोबत दक्षिणेत श्रवणबेळगोळ या ठिकाणी गेले. श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावरून असे माहित पड़ते की चंद्रगुप्त आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये जैनमुनी झाला होता. चंद्रगुप्त हा शेवटचा मुकुटधारी मुनी होता म्हणून चंद्रगुप्ताला जैन धर्मात विशेष स्थान आहे. श्रवणबेळगोळ येथे चंद्रगुप्ताने प्रायोपवेशन म्हणजे स्वेच्छेने अन्नत्याग करुन आपला प्राण सोडला.( इ.स.पू 297)

चंद्रगुप्त मौर्य हा पहिला चक्रवर्ती सम्राट होता की ज्याने आपल्या साम्राज्याची सीमा हिंद्कुशपर्यंत नेली होती. प्रथमच जवळपास संपूर्ण भारत एकछत्री अमलाखाली आणला. परकीय शत्रूंच्या तावडीतुन भारतभूमी स्वतंत्र केली. मगधचे साम्राज्य जिंकून भारतात उत्तर भारतात एक प्रबळ साम्राज्य उभे केले. चंद्रगुप्त मौर्य खरोखरच एक महान प्रतापी चक्रवर्ती सम्राट होता.
आपण ह्या पोस्ट मध्ये चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य बद्दल माहिती घेतली . तुम्हाला जर HISTORY OF MAURYA EMPIRE IN MARATHI बद्दल माहिती जाणून घायची असेल तर तुम्ही हि पोस्ट वाचू शकता .
विविध माहिती जाणून घेण्यासाठी मराठीमाहीती या वेबसाईटला भेट दया .





छान उपयुक्त माहिती दिली सर आपण
Thank You Sir
Very nice information
thank you sir